प्रेरणादायी स्वातंत्र्य सेनानी दुर्गाबाई देशमुख   

गाऊ त्यांना आरती , शिरीष चिटणीस 

स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान देणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आणि घटनासमितीतील प्रमुख विचारवंत दुर्गाबाई देशमुख यांनी १९२३ मध्ये वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह केला. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा अटक झाली. १९३० मध्ये महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांनी इतर सत्याग्रहींसोबत सत्याग्रह, हरिजन सेवा आणि स्वदेशी प्रचार केला. २५ मे १९३० रोजी प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्याबरोबर केलेल्या मीठाच्या सत्याग्रहात अटक झाल्यानंतर त्यांची काही माहिन्यांनी सूटका करण्यात आली. बाहेर येताच दुर्गाबाईंनी पुन्हा भाग घेतल्याबद्दल अटक करण्यात येऊन दीर्घ काळासाठी तुरूंगात टाकण्यात आले. काकीनाडा, वेल्लोर आणि मदुराईच्या तुरूंगामध्ये त्यांना १९३० ते १९३३ या काळात डांबण्यात आले होते. सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय प्रतिष्ठा पाहून त्याकाळी कैद्यांची श्रेणी ठरवली जात असे. कैद्यांची दयनीय अवस्था पाहून कैद्यांच्या कोठडीत त्यांनी हलवण्याची केलेली विनंती तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावली. तिथे राहून त्यांना समजलं की तिथं राहणार्‍या महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी कोणतीही माहिती नसल्याने चुकीच्याच आरोपांमध्ये अडकवलं जात असे. हे पाहूनच दुर्गाबाईंना कायद्याच शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एलएलबी पूर्ण करून मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली.
 
स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत घेतच न्यायालयामध्ये अनेक प्रकरणे त्यांनी विनामुल्य लढविली. गरीब, वंचित आणि निराधार महिलांना न्याय मिळवून देताना त्याच्या अधिकारांसाठी प्रखर युक्तीवाद त्या करीत असत. खुनाच्या प्रकरणात युक्तिवाद करणार्‍या त्या पहिल्या महिला वकील होत. स्वातंत्र्यलढ्यात सातत्याने भाग घेणार्‍या दुर्गाबाई यांना १९७५ मध्ये त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीमुळे पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. जगदीश पुरस्कार, पॉल जी हॉफमॅन पुरस्कार, नेहरू साक्षरता पुरस्कार, यूनेस्को पुरस्कार, जीवन पुरस्कार आणि इतर पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते. केवळ तुरूंगवास भोगून क्रांतीकारक म्हणूनच त्यांनी कार्य केलं नाही तर, घटना समितीच्या सदस्य म्हणून भारताच्या भविष्याची पाया भरणी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महिलांच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि समाजसेवेच्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य केलं. 
 
दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म १५ जुलै १९०९ ला आंध्र प्रदेशातील काकीनाडातील राजमुंद्रीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारसरणीच्या असलेल्या दुर्गाबाई यांचे लग्न त्यावेळच्या रुढी-परंपरेनुसार आठव्या वर्षी गुम्मिडिथाला सुब्बाराव या श्रीमंत जमीनदार कुटुंबातील व्यक्तीशी लावून देण्यात आले. त्या १५ वर्षाच्या झाल्या तेव्हा सामाजिक चालीरीतीनुसार त्यांना त्यांच्या पतीसोबत राहून वैवाहिक जीवनाची सुरवात करावी लागणार होती. परंतु त्यांनी त्याला कडाडून विरोध करीत दोन्ही घरांकडील संमती घेत पतीला दुसर्‍या मुलीशी लग्न करण्यास प्रवृत्त करीत झालेले लग्न नाकारून समाजसेवेला वाहून घेतलं. वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि स्त्री सक्षमीकरणाचा पाया रचत त्यांनी पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात उभं राहून स्वातंत्र्यलढ्याबरोबरच शिक्षण, समाजसुधारणा आणि महिला सक्षमीकरण यांचा मार्ग निवडला. दुर्गाबाईंचा लहानपणापासूनच भारतीय राजकारणाशी संबंध होता. वयाच्या १२ व्या वर्षी म्हणजे १९२१ साली इंग्रजी माध्यमाचे शिक्षण लादण्याच्या निषेधार्थ त्यांनी शाळा सोडली. त्यांनी हिंदीचा अभ्यास सुरू केला. त्याकाळी संपूर्ण देशभर स्वातंत्र्यलढ्यासाठी हिंदी भाषेतूनच भाषणे दिली जात होती. त्यामुळे या राष्ट्रीय चळवळीसाठी सर्वच भाषिक हिंदी भाषा शिकत होते. 
 
हिंदी पाठशाळेची सुरूवात
 
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडीत नेहरू, सरदार पटेल, राजगोपालचारी आणि असंख्य स्वातंत्र्य सेनानी हिंदी भाषेमधूनच भाषणे देत असत. स्वातंत्र्यलढ्यासाठी हिंदी भाषा ही देशभर चळवळीसाठी प्रमुख भाषा होती. नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी भारतभर विविध भाषिकांचे हिंदी शिकण्याचे प्रमाण प्रचंड होते. दुर्गाबाईनी लवकरच हिंदी भाषेत योग्यता प्राप्त करून १९२३ मध्ये मुलींसाठी राजमुंद्री येथे बालिका हिंदी पाठशाळा सुरू केली. काकीनाडामध्ये महात्मा गांधींच्या भेटीच्या निमित्तानं देवदासींच्या प्रश्नासाठी निधी गोळा करून विशेष सभेचे आयोजन त्यांनी केले होते. या सभेत महात्मा गांधीनी देवदासींच्या समस्येवर भाष्य केल्याने काही देवदासींनी आपल्या मुलींना या प्रथेत अडकवण्याऐवजी त्यांची लग्न लावून आयुष्य चांगल्याप्रकारे मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. देवदासी प्रथा या स्त्रीयांच शोषणांच प्रतिक आहे, हे जाहीरपणे मांडणार्‍या बहुतेक दुर्गाबाई या पहिल्या महिला प्रतिनिधी असतील. मुस्लिम महिला या पडदा प्रथेमुळे सामाजिक संवादापासून दूर रहायच्या त्यांच्याशी महात्मा गांधींचा संवाद याच सभेत त्यांनी साधून दिला. गांधीजींशी संवादामुळे मुस्लिम महिलांच्या मध्ये शिक्षण आणि सामाजिक सहभागासाठी आत्मविश्वास निर्माण झाला. या सभेमध्ये त्या तेलगु भाषेतील सर्व महिलांचा संवाद अरव्वलीत हिंदी भाषेतून गांधींना सांगीत, गांधींचा हिंदी भाषेतील अनुवाद तेलगु भाषेत करून सर्व महिलांना सांगण्यामुळे गांधीजी प्रचंड प्रभावित झाले. मुलींसाठी हिंदी शाळा सुरू करून त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग तसेच सामाजिक सुधारणेसाठीचा प्रयत्न यासाठी दुर्गाबाईंचे कौतुक करून गांधीजींनी त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविले. 
 
दक्षिण भारतात होणार्‍या महात्मा गांधींच्या दौर्‍यावर अधिकृत अनुवादक म्हणून दुर्गाबाईंची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीनंतर दुर्गाबाईचं महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्याशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झाल. पुढील काळात स्वदेशी चळवळीला पाठींबा देत त्यांनी खादीचा प्रचार केला. वयाच्या २४ व्या वर्षी दुर्गाबाई देशमुख इंग्रजी अक्षरमाला शिकल्या. नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर आंध्र विद्यापीठातून राजकारणशास्त्रात विशेष प्रावीण्यासह बी.ए.ची पदवी घेतली. १९३० ते १९३३ या कालावधीत तुरुंगवास भोगल्यानंतर महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वकील होणे गरजेचे वाटल्याने मद्रास विद्यापीठात प्रवेश घेऊन १९४२ मध्ये एलएलबी झाल्या आणि मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करू लागल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली होती पण दुसर्‍या महायुद्धामुळे त्यांना लंडनला जाणे रद्द करावे लागले. शिक्षणाप्रती असलेल्या प्रेमामुळे दुर्गाबाई भारतीय महिलांसाठी शिक्षणाच्या चळवळीचं एक प्रेरणास्थान ठरल्या. बालिका हिंदी केंद्रातून त्यांनी ४०० हून अधिक महिलांना स्वातंत्र्यचळवळीत स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार केले. त्यांना फक्त हिंदीच शिकवले नाही तर खादी विणणं, स्वदेशी वस्त्र तयार करण आणि राष्ट्रभक्तीपर गीत गायन यासारख्या गोष्टीचंही शिक्षण दिलं. ब्रिटीशांनी कारवाई करून ही पाठशाळा बंद पाडली तरी न डगमगता १९३७ साली आंध्र महिला सभा ही संस्था महिलांच्या शिक्षण, सक्षमीकरण आणि स्वावलंबनासाठी त्यांनी उभी केली. या संस्थेमार्फत हिंदी, तेलगू, इंग्रजी शिकविण्याचे वर्ग सुरू करून महिलांना विणकाम, शिवणकाम, हस्तकला, संगीत, नृत्य इतर सांस्कृतिक उपक्रमा मार्फत स्वकर्तुत्वावर उभे केले. 
 
१९४६ मध्ये दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांतातून भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून संविधान सभेच्या अध्यक्षांच्या पॅनलमध्ये समाविष्ट झाल्या. दुर्गाबाई देशमुख आणि नेहरू यांचं नातं सहकार्य, आदर, विश्वासानं भरलेले होते. नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यचळवळीत आणि नंतर स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्मितीत दुर्गाबाईची भूमिका महत्वाची ठरली. दुर्गाबाईंच्या तार्किक विचारसरणीमुळे आणि स्त्री सक्षमीकरणाच्या त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे नेहरूंनी त्यांना हिंदू कोड बीलासारख्या महत्वाच्या कायद्यांवर काम करण्याची संधी दिली. १९५३ मध्ये नेहरूंनी दुर्गाबाईंना केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या पहिला अध्यक्षा म्हणून नियुक्त केले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी आणि ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी मोठं योगदान दिले. विजयालक्ष्मी पंडीत नेतृत्व करत असलेल्या चीनमधील एका शिष्ट मंडळात सदस्य म्हणून नेहरूंनी दुर्गाबाईंची निवड केली होती. चीनच्या दौर्‍यात दुर्गाबाईंच्या डोक्यात कौटुंबिक न्यायालयाच्या कल्पनेने जन्म घेतला. नेहरूंच्या संमतीने ही योजना भारतात राबविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुर्गाबाई या दोघानांही महिलांच्या प्रगतीची आस होती. दुर्गाबाईंना समाजकल्याण आणि शिक्षणाच्या माध्यमातून तर आंबेडकरांना कायदेशीर बदल आणि राजकीय सक्षमीकरणाव्दारे महिला मुक्ती साधता येऊ शकते असं वाटायचं.
 
दुर्गाबाई देशमुख यांचा अर्थतज्ञ सी.डी. देशमुख यांच्याशी २२ जानेवारी १९५३ रोजी दुर्गाबाईंच्या घरी नोंदणीव्दारे विवाह झाला. पंडीत जवाहरलाल नेहरू आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांनी विवाहाचे साक्षीदार म्हणून सह्या केल्या. या विवाहामुळे दुर्गाबाईच्या सामाजिक कार्यावर सकारात्मक प्रभाव पडला आणि त्यांचं योगदान व्यापक झालं. सी.डी. देशमुख यांनी दुर्गाबाईंना नोव्हेंबर १९५२ मध्ये त्यांच्या बागेत लग्नाची मागणी घातली होती. त्या दिवसांबद्दल आठवताना दुर्गाबाईंनी लिहिलं आहे की...मी त्यांना सांगितलं की मी एक साधी महिला आहे. माझं लोकांसोबत पार्टीमध्ये उठणं बसणं नाही. मला फॅशनेबल चपला घालून तशा पार्ट्यांना जायला जमत नाही. तरी तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचे आहे का? आधुनिक जगातल्या पार्ट्यांना कधी न जाणार्‍या, आधुनिक महिलांसारखं राहणीमान नसलेल्या दुर्गाबाईंनी देशमुख यांना स्पष्टपणे सांगितलं, की त्या अत्यंत साधी जीवनशैली जगणार्‍या व्यक्ती आहेत. तरीही सी.डी. देशमुखांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय मागे न घेता लग्न केले. दोघांचा लग्न विवाह केवळ एक वैयक्तीक नातं नव्हतं, तर दोन प्रगल्भ विचारांच्या लोकांचा समाज कल्याणासाठी एकत्र घेऊन जाणारा प्रवास होता. हा विवाह संपूर्ण भारतभर भारतीय समाजामध्ये पुनर्विवाहाबद्दलचा दृष्टीकोन बदलणारा ठरला. १९७६ मध्ये मधुमेहामुळे दृष्टी गमवावी लागणार्‍या दुर्गाबाई यांचे ९ मे १९८१ रोजी सी.डी. देशमुखांच्या सानिध्यात निधन झाले. संपूर्ण भारतवर्षातील समाजाला प्रेरणा देणार्‍या स्वातंत्र्यसेनानी दुर्गाबाई देशमुख यांचे व्यक्तिमत्व अविस्मरणीय होते. त्यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यसेनानी व्यक्तींच्या त्यागामुळे स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला.

Related Articles